सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पावसामुळे पिकाचे होणारे नुकसान आणि त्यासाठीच्या उपाययोजना!
यंदाच्या खरीप हंगामात चांगला पाऊस झाला आणि वेळेवर झाला. त्यामुळे पिकांची पेरणी अगदी वेळेवर झाली व पिकेही जोमाने वाढली आहेत. शेतकरी आंतरमशागतीची कामे करत आहेत, मागील अनेक वर्षानंतर शेतात पीक आनंदाने डोलताना पाहून शेतकरी खुश आहेत व मशागतीचे कामे नेटाने करत आहे.
परंतु मागील अनेक दिवसापासून राज्यातील बऱ्याच भागात पावासाच्या संततधार होत आहे, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागात मागील काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. सततचा पाऊस, अतिवृष्टीने या भागातील ठिकठिकाणी पिकामध्ये पाणी साचले असल्याचे निदर्शनात येते. त्यामुळे पिकांमध्ये मर, मूळकूज, पानावरील करपा, पाने पिवळे पडणे, फळावर ठिपके, फळसड, फुलगळ, फळगळ इत्यादी अश्या अनेक समस्या जाणवत आहेत. जमिनीत पाणी साचल्यामुळे पिकास दिलेले खते पिकास उपलब्ध होत नाहीत, परिणामी पिकाची वाढ मंद गतीने होते व खुंटते. सोबतच काही भागात मूग, सोयाबीन डाळवर्गीय पीक काढणीस आले असताना शेंगा फुटाणे, दाण्यांना शेंगामध्येच अंकुरण येणे, शेंगावर बुरशी तयार झालेले आहे असेही काही समस्या दिसून येत आहेत. कपाशी सारख्या महत्वाच्या पिकावर आकस्मित मर, पाते फुलेगळ, बोंडे सड यांसारख्या समस्या समस्या दिसून येत आहेत. सध्याच्या ढगाळ हवामानामुळे अनेक किडींच्या वाढीस पोषक असे वातावरण मिळत असून त्यांचा पिकांवर प्रादुर्भाव वाढल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच कंदवर्गीय पिकांमध्ये जमिनीत जास्तीचे पाणी साचल्यामुळे कंदकूज कंदसड सारखे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
उपाययोजना :-
• प्रथम शेतात साचलेले पाणी शेताबाहेर काढावे, त्यासाठी उतार पाहून चर काढावी.
• ओल्या जागेवर अमोनियम सल्फेट २५ किलो प्रति एकर याप्रमाणे गरजेनुसार व पीक अवस्था पाहून वापर करावा.
• बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी पिकावर शिफारस केलेले योग्य ते बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी.
• तसेच किडींच्या नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे कीटकनाशके फवारणी साठी वापरावे
• पिकावर पिवळे पणा जाणवत असेल तर त्यासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये चा वापर फवारणीद्वारे करावा.
• नुकसानग्रस्त पिकांवर चांगल्या वाढीसाठी पोटॅशिअम नायट्रेंट (१३:०:४५) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी यांची फवारणी करावी.
• जे पीक काढणीला आले आहे त्याची योग्य वेळी काढणी करावी.
• फळबागांमध्ये फुलगळ, फळगळ होत असेल तर त्याचे व्यवस्थापन करावे.
• वातावरणामुळे पिकावर आलेला अजैविक ताण कमी करण्यासाठी सिलिकॉन अन्नद्रव्याची फवारणी करू शकता.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.