पशुपालनअॅग्रोवन
उष्ण वातावरणात जनावरांना सांभाळा!
उष्ण हवामानात जनावरांचे व्यवस्थापन:
उच्च तापमानामुळे सर्व प्रकारच्या जनावरांवर (उदा. गाय, म्हैस इ.) ताण येतो, त्यामुळे मिळणारे उत्पादन कमी होते. म्हणून या काळात जनावरांची काळजी खालीलप्रमाणे घेणे गरजेचे आहे.
खाद्य
• जनावरांना चारा शक्यतो सकाळी व सायंकाळी द्यावा. हिरव्या चाऱ्यामध्ये मका, लसूण घास, कडवळ यासारखा पोषक चारा दिल्यास आरोग्य चांगले राहते.
• आहारात क्षार मिश्रणाचा वापर करावा, म्हणजे दूध उत्पादनात सातत्य टिकून राहते व प्रजनन क्षमताही सुधारते.
पाणी
• स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो.
• पाण्याची भांडी आकाराने मोठी असावीत. ही भांडी अशा ठिकाणी ठेवावीत, जेणे करून सर्व जनावरांना सहजरीत्या पाणी पिता येईल. जर गायी व म्हशी मुक्तपणे संचार करत असतील, तर (मुक्त गोठा) पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत.
गोठा
• छोट्या, वयस्कर व आजारी जनावरांना सुयोग्य निवाऱ्याची अधिक गरज असते.
• जनावरांना सकाळी व सायंकाळी चरण्यासाठी न्यावे, दुपारची चराई टाळावी. या काळात जनावरांना सावलीत बांधावे.
• गोठ्याचे छप्पर गवत, पालापाचोळा यांनी झाकून त्यावर पाण्याचा फवारा मारावा. कारण छप्पर थंड राहून उन्हाची झळ कमी होते, शक्य झाल्यास गोठ्यात पंखे, फाॅगर्स बसवून घ्यावेत.
• गोठ्यात सभोवताली हिरवी झाडे असल्यास गोठ्यातील वातावरण थंड राहण्यास मदत होते. झाडे सभोवताली नसल्यास दुपारच्या वेळी वारा वाहत असलेल्या दिशेने गोठ्याच्या बाजूस पाण्यात भिजवलेले बारदान किंवा गोणपाट बांधल्यामुळे गोठ्यात थंड वारा येतो व वातावरण आल्हाददायक राहण्यास मदत होते.
संदर्भ – अॅग्रोवन (डॉ. मीनल पऱ्हाड)
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!