सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकातील तणनियंत्रण!
सोयाबीन पीक खरीप हंगामामध्ये घेतले जाणारे पावसाळी पीक आहे, त्यामुळे शेतामध्ये पीक उभे असताना सोयाबीनच्या झाडांसोबतच आवश्यक नसणारे इतर पिके (मागील हंगामातील) व तणांची मोठ्या प्रमाणावर उगवण होते व झपाट्याने वाढ होते. सोयाबीनची उगवण झाल्यापासून पिकाची कापणी होईपर्यंत तण पिकाला अपायकारक असते. पिकामध्ये वाढणारे तण सोयाबीनशी पोषण अन्नद्रव्ये, पाणी, वाढीसाठी आवश्यक जागा, सूर्य प्रकाश इत्यादींसाठी स्पर्धा करते, त्याचा परिणाम कमी उत्पादन येण्यात होतो. तणांमुळे सोयाबीन पिकामध्ये किडी व रोगांचे प्रमाण वाढून त्यांचे नियंत्रण व मशागतीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होऊन तण नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांमुळे उत्पादन खर्च वाढतो. काढणीच्या वेळी वाढलेल्या तणांमुळे अडथळा निर्माण होतो तसेच त्यांचे बी पिकाच्या बियांसोबत मिसळले जाते त्यामुळे सोयाबीनच्या बियाण्याची गुणवत्ता कमी होते. सोयाबीन पिकामध्ये येणार्या तणांचे योग्य वेळी नियंत्रण न केल्यास उत्पादनात सरासरी ३० ते ४० टक्के पर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे सोयाबीनची पेरणी करून यशस्वी उगवण झाल्यानंतर सुरुवातीच्या २०-४५ दिवसांच्या कालावधीमध्ये तणांचे योग्य नियंत्रण फार महत्वाचे असते.
नियंत्रण:-
• सोयाबीन बियाणांची पेरणी झाल्याबरोबर तातडीने (४८ तासांच्या आत) पेंडिमेथिलीन ३८.७% सीएस @७०० मिली प्रति एकर फवारणी करावी.
• तसेच लागवडीनंतर इमॅझेथ्यापिर १०% एसएल @४०० मिली किंवा क्विझ्यालोफॉप इथिल ५% इसी @४०० मिली प्रति एकर २०० ते २५० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
• फवारणी करताना जमिनीमध्ये वाफसा असेल याची दक्षता घ्यावी.
• तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर खतांची मात्रा द्यावी.
• सोयाबीन पिकात एकात्मिक तण व्यवस्थापन करण्यासाठी बी उगवण्यापूर्वी वापरवायचे कोणतेही एक तण नाशक फवारावे आणि ३० ते ३५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!