AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात ९९% पावसाची शक्यता!
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ
राज्यात ९९% पावसाची शक्यता!
➡️ राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीचा दीर्घकालीन पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व कृषी हवामान फोरम साऊथ आशियाचे संस्थापक सदस्य डॉ. रामचंद्र साबळे यांनी मंगळवारी (ता. १) जाहीर केला. यंदा राज्यात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये पाच टक्के कमीअधिक तफावत आढळून येण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. ➡️ महाराष्ट्रासाठी २०२१ साठी जून ते सप्टेंबर मॉन्सून पावसाचा अंदाज वर्तविला आहे. स्थानिक ठिकाणच्या पाऊस अंदाजाच्या मॉडेलनुसार संबंधित ठिकाणचे गेल्या तीस वर्षांचे हवामान आणि कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रांनी नोंदवलेली यंदाची हवामान घटक विचारात घेण्यात आले आहेत. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात पावसात अकोला, पाडेगाव निफाड येथे खंड राहण्याची शक्यता असून दापोली, पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. ➡️ ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत पावसाचे प्रमाण चांगले राहील. तर कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड राहतील. यंदा मध्य विदर्भ विभागात सर्वाधिक १०२ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तर यवतमाळ केंद्राच्या परिसरात सरासरीच्या ८८२ मिलिमीटरपैकी ९२६ मिलिमीटर म्हणजेच १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पाच टक्के कमीअधिक तफावत आढळून येईल. पश्चिम विदर्भ विभागात ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये अकोला केंद्राचा समावेश येतो. तर पूर्व विदर्भ विभागात १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला असून यामध्ये शिंदेवाही (चंद्रपूर) केंद्राचा समावेश येतो. ➡️ पश्चिम, मध्य महाराष्ट्रात ९९ टक्के पावसाची शक्यता असून यामध्ये कोल्हापूर, कराड, पाडेगाव, सोलापूर, राहुरी, पुणे केंद्राच्या समावेश होतो. पाडेगाव केंद्राच्या परिसरात सर्वांत कमी पाऊस पडेल. कोल्हापूर, कराड केंद्राच्या परिसरात शंभर टक्के पाऊस पडेल. उत्तर महाराष्ट्रात, कोकण व मराठवाडा विभागात ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रात निफाड, धुळे, जळगाव, कोकण विभागात दापोली, मराठवाडा विभागात परभणी केंद्राचा समावेश होतो. ➡️ जून व जुलै महिन्यांत मोठ्या खंडाची शक्यता, तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत जोरदार पावसाची शक्यता, असे वैशिष्ट्य राहील. या वर्षी मॉन्सूनचे आगमन गुजरातच्या दिशेने होणे शक्य असून, दहा जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापणे शक्य आहे. पेरणी करताना ६५ मिलिमीटर इतका पाऊस होऊन जमिनीत ओलावा झाल्यानंतर पेरणी करणे हिताचे आहे. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे जसे -२ ओळी बाजरीच्या एक ओळ तुरीची पेरावी. त्यामुळे मुख्य पिकाबरोबर आंतरपिकांचे उत्पन्न अधिक मिळते व जमिनीची सुपीकता वाढते. संदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
101
24
इतर लेख