सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गहू पिकासाठी योग्य पाणी व्यवस्थापन महत्वाचे!
भारी जमिनीकरिता १८ दिवसांच्या अंतराने ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम जमिनीसाठी १५ दिवसाच्या अंतराने ७ पाळ्या द्याव्यात तर हलक्या जमिनीस १०-१२ दिवसाच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात. परंतु पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्था व या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनावर होणारे परिणाम खाली नमूद केले आहेत.
➡️ मुकुटमुळे फुटण्याच्या वेळी (पेरणीनंतर २१-२५ दिवसांनी):
या वेळी जमिनीत पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे मुकुटमुळे कमी फुटतात. फुटलेल्या मुळ्या जास्त पसरत नाहीत. फुटवे कमी येतात गहू काढणीस लवकर येतो व उत्पादनात घट येते.
➡️ फुटवे फुटण्याची अवस्था (पेरणी नंतर ५५-६० दिवसांनी):
ओंब्या कमी बाहेर पडतात. बाहेर पडलेल्या ओब्यांची लांबी कमी होते व पर्यायाने उत्पादनात घट येते.
➡️ पीक फुलोऱ्यात येणे (पेरणी नंतर ७०-८० दिवसांनी):
परागीभवन कमी होऊन दाण्याची संख्या घटते व पर्यायाने उत्पादन घटते.
➡️ दाण्यात चिक भरण्याची वेळ (पेरणीनंतर ९०-१०० दिवसांनी):
या अवस्थेत दाणे पोसतात, त्यांचा आकार वाढतो. परंतु जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार लहान होतो व वजन कमी होते.
दाणे टणक होण्याची अवस्था (पेरणी नंतर १०० दिवसांनी):
या अवस्थेत जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार कमी होतो. दाण्यांवर सुरकुत्या पडून प्रत निकृष्ट होते व पर्यायाने उत्पादनात घट येते.
ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नाही अशा परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी अपुरे असल्यास व एक ते पाच पाण्याच्या पाळ्या द्याव्या.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.