सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
काकडी फळात कडवटपणा येण्याची कारणे व उपाययोजना!
➡️ काकडी पिकात कुकूरबिटासीन हा नैसर्गिक घटक वेलांमध्ये, पानांमध्ये तसेच थोड्या प्रमाणात फळामध्ये असल्यामुळे पिकात कडवटपणा असतो.
परंतु काही कारणांमुळे काकडी फळांमध्ये जास्त कडवटपणा येऊन फळांची गुणवत्ता खालावते व कडवट चव असल्याने बाजारात अशा फळांना भाव मिळत नाही व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.
फळामध्ये कडवटपणा येण्याची कारणे-
• अतिशय कमी तापमान किंवा अति उष्ण तापमान
• फुलोरा आणि फळ अवस्थेत पाण्याचा ताण पडून पिकात जास्त काळ कोरडेपणा राहिल्याने.
• पीक वाढ आणि विकासाच्या अवस्थेत आठ तासांपेक्षा कमी सूर्यप्रकाश मिळाल्याने.
• पिकास सेंद्रिय घटक तसेच अन्नद्रव्ये कमी पडल्यास
• पीक कीड व रोगांना बळी पडणे
अशा जैविक आणि अजैविक ताणांमुळे काकडी फळपिकात कडवटपणा उतरतो.
1. यावर उपाययोजना म्हणून काकडीची योग्य हंगामात योग्य अंतरावर लागवड करावी. जेणेकरून पिकास पुरेपूर सूर्यप्रकाश व तापमान मिळेल
2. तसेच पिकाला जमिनीच्या प्रकारानुसार वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे. उन्हाळ्यात पाण्याचा ताण पडू नये व जमिनीत ओलावा टिकवून राहण्यासाठी सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा.
3. लागवडीपूर्वी शेतात चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर करावा. तसेच वाढीच्या अवस्थेत पिकाच्या गरजेनुसार संतुलित अन्नद्रव्ये द्यावीत.
4. सुरुवातीच्या काळापासून कीड व रोगांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करावे व पिकावर सिलिकॉन ३% @ १ मिली व कीटोगार्ड @ २ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. जेणेकरून पीक जैविक व अजैविक ताणांना बळी पडणार नाही.
5. तरीही फळ तोडणीच्या वेळेस कडवटपणा आढळून आल्यास ५ किलो युरिया, ५ किलो मॅग्नेशिअम सल्फेट व ५०० ग्रॅम ह्यूमिक प्रति एकर प्रति आठवडा ठिबक मधून सोडावे. हि अन्नद्रव्ये कमीत कमी ३ आठवडे द्यावीत. जेणेकरून पुढील तोडण्यांमधील फळांचा कडवटपणा कमी होण्यास मदत होईल
वरील पद्धतीने नियोजन केल्यास नक्कीच फळांमधील कडवट पणा कमी होईल व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.