कृषी वार्ताAgrostar
कांदा उत्पादकांसाठी आनंदाची गोष्ट
केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून ५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. यानुसार लवकरच विविध ठिकाणी कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे.
नाशिक: केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून ५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. यानुसार लवकरच विविध ठिकाणी कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांना विक्रीचा पर्याय मिळावा, देशात कांदा विक्रीची समस्या निर्माण होऊ नये, भाववाढीनंतर कांद्याचे भाव संतुलित असावेत यासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून नाफेडकडून कांदा खरेदी करण्यात येते. दरवर्षी होणाऱ्या खरेदीच्या तुलनेत ही सर्वांत मोठी कांदा खरेदी नाफेड करणार आहे. या माध्यमातून ५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी होणार आहे. महाराष्ट्राबरोबर गुजरातमध्ये प्रथमच कांदा खरेदी होणार आहे.
चालू वर्षी स्वामिनाथन आयोगाच्या भाव स्थिरीकरण निधीची सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याने खरेदीचा मार्ग सुकर झाला आहे. या वर्षी ५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यामध्ये ४५ हजार मेट्रिक टन कांदा महाराष्ट्रातून तर ५ हजार मेट्रिक टन कांदा गुजरातमधून खरेदी केला जाणार आहे.