सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आले व हळद पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी आंतरमशागत करणे महत्वाचे!
आले व हळद पिकामध्ये भरणी करणे हे एक महत्त्वाचे काम आहे. लागवडीपासून २.५ ते ३ महिन्यांनी भरणी करावी. या कालावधीत ही पिके प्रामुख्याने शाखीय वाढीच्या अवस्थेमध्ये असते, ही अवस्था उत्पादनात महत्त्वाची आहे. या अवस्थेमध्ये प्रामुख्याने पिकामध्ये पानांची संख्या, फुटव्यांची संख्या आणि उंची निश्चित होते.
• भरणी केल्याने उत्पादनात १५-२० टक्के वाढ होते.
• भरणी केल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते आणि गड्ड्यांचे चांगले पोषण होते.
• उघडे पडलेले गड्डे पूर्ण झाकले जातात.
• आल्याचे गड्डे सूर्यप्रकाशात उघडे राहिल्यास ते हिरवे पडतात, त्यांची वाढ पूर्ण थांबते, त्यामुळे उत्पादनात घट येते.
• कंदमाशीचे नियंत्रण करता येते.
• भरणीवेळी दिलेली खतमात्रा मातीआड होण्यास मदत होते. त्यामुळे खते वाया न जाता त्यांची कार्यक्षमता वाढते.
• पावसामुळे उथळ झालेल्या सऱ्या खोल होण्यास मदत होते. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करता येते. लागवड पद्धतीनुसार भरणी करण्याची पद्धत अवलंबून आहे.
• सरी-वरंब्यावर लागवड केलेल्या हळद व आल्यामध्ये सरीमधील ५-७ सें.मी. माती शिपीच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूच्या गड्ड्यांना लावावी.
• माती लावताना संपूर्ण कंद झाकला जाईल याची काळजी घ्यावी.
• गादीवाफ्यावर लागवड केली असल्यास दोन गादीवाफ्यामधील सरीतील माती उकरून गादीवाफ्यावर २-३ इंचाचा थर येईल याप्रमाणे माती लावावी किंवा पॉवर टीलरच्या साह्यानेदेखील भरणी करता येते, त्यामुळे मजुरांची बचत होते.
• भरणी केल्यानंतर पाऊस नसल्यास पिकास हलके पाणी द्यावे. गादीवाफ्यावर भरणी करताना ठिबक सिंचनाच्या नळ्या आणि तोट्या मातीमध्ये जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.